Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 1 October 2020

प्राचीनबर्हीला नारदाचा उपदेश*(पुरंजन रूपक कथा)



*।। श्री गुरुः शरणम् ।।*

*प्राचीनबर्हीला नारदाचा उपदेश*(पुरंजन रूपक कथा)

प्राचीनबर्ही हा राजा यज्ञादी कर्मकांडात इतका गढुन गेला की कर्मामध्ये त्याची बुद्धी आसक्ती झाली, त्यामुळे मूळ तत्वज्ञान (भक्तिमार्ग व ज्ञान) याकडे लक्ष राहिले नाही. त्यामुळे एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ. बर्ही म्हणजे दर्भ. म्हणून प्राचीनबर्ही , त्याला उपदेश करण्याकरता श्रीनारद महर्षी आले. प्राचीनबर्हीनी त्यांचा आदरसत्कार केला. नारद महर्षी म्हणाले, यज्ञामुळे पुण्य मिळेल. स्वर्ग प्राप्त होईल. परंतु पुण्य संपले की पुन्हा मृत्यूलोकी यायचे. राजा खरे फळ म्हणजे सर्व दुःखे संपली पाहिजेत. पुर्ण आनंद मिळाला पाहिजे यासाठी नारदांनी एक कथा रूपक म्हणून सांगितली. .....
पुरंजन नावाचा एक अत्यंत किर्तीशाली राजा होऊन गेला त्याने त्याचा चांगला व समर्थ मित्र "अविज्ञात" त्याला सोडून दिले. व एकटाच हिमालयाच्या कुशीत हिंडताना त्याला नऊ द्वारे असलेली बागबगीचे, सोन्या रुप्यांची घरे, तळे, सरोवरे त्यात कुजन करणारे राजहंस, पशु ,पक्षी, फुले, फळे यांनी गजबजलेली अशी नगरी दृष्टीस पडली. पुरंजन त्या उद्यानापासून जात असताना तेथे असलेल्या तरुण स्त्रीला पाहिले. रूपाने उत्तम व वयाने षोडशी (सोळा वर्षाची) होती. सुडोेल बांधा व मोहक होती. तिने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे अलंकार सौंदर्य  तिची शोभा वाढवत होते. पाच फण्यांचे नाग तिचे सर्व बाजुनी रक्षण करीत होते. व नोकर-चाकर तिच्याबरोबर होते. ती देवतेप्रमाणे चालत स्वतःला पती शोधत होती. तिला पाहताच तिच्या एका दृष्टिक्षेपाने घायाळ झालेला हा राजा पुढे झाला व तिला " तू कोण ? कुठली ? इथे नगरात काय करतेस ? हे सेवक कोण ? रक्षक असणारा हा नाग कुठला ? तू देवता, लक्ष्मी की पार्वती कोण आहेस ? मी तुझ्यावर मोहित झालो आहे. ती तरुणीहि त्या सुस्वरूप पुरुषावर भाळली. नारद म्हणतात. राजा, तिने हि त्याचा स्वीकार केला. तो तिच्याबरोबर त्या नगरीत राहू लागला. त्याने पुष्कळ यज्ञ, याग केले. प्रजावृद्धी आली. शंभर वर्षे विविध विषय उपभोगले.
एकदा एक गंधर्वाधिपती सैन्यासह आला आणि त्याने पुरंजनाचे सर्व ऐश्वर्य लुटले. यवनसैन्याने आणखी जर्जर केल्याने पुरंजनाला काहिच सुचेना. आपल्याशिवाय राहू न शकणाऱ्या आपल्या, पत्नीचे कसे होणार ? मायामोहात सापडलेल्या पुरंजन राजाला ममता सोडवेना. अंतसमयी असणाऱ्या मनातील विचारामुळे पुन्हा दुसर्‍या जन्मात पुरांजनाला स्त्री रूप प्राप्त झाले. मोठी राजकन्याच झाला. उत्तम राजपुत्रा बरोबर विवाह होऊन संसार सुख उपभोगले. यथावकाश दोघे अरण्यात गेले व  राजाने योगमार्गाने शरीर सोडून दिले. ती स्त्री म्हणजे *पुरंजन* राजा.  हिला पतिवियोगाने दुःख झाले. आपला देह अर्पण करण्यासाठी चिता रचली. "अविज्ञात" नावाच्या त्या मित्राला सोडुन राजा पूरंजन आला होता. तो मित्र ब्राह्मण रूपाने जवळ आला. त्यांनी तिला उपदेश केला, तु  राजकन्या नाहीस. तु पूर्वजन्मी कोण होतास त्याचे स्मरण कर, तु पुरंजन आहेस मी तुझा मित्र आहे. मी तुला सोडवण्याकरिता आलो आहे. पुर्वजन्माचे स्मरण तु कर म्हणजे तु या दुःखातून मुक्त होशील. तु आणि मी एकच आहोत आणि वस्तुतः आनंदरूप आहोत. *सो S हम् अहम सह:* हा उपदेश केला. सो S हम ची त्या पुरंजन राजाला ज्ञान झालं आणि त्याची दुःख दुर झाली. नारदांनी ही कथा प्राचीनबर्हीला सांगितली.
प्राचीनबर्ही राजा म्हणाला "नारदजी महाराज, तुमची गोष्ट मला कळली नाही." कोण? पुरंजन राजा, त्याला भेटलेली स्त्री कोण,? यवन सैन्य कोण? कोणता राजा ? त्याचा खुलासा करावा.
नारदऋषी सांगतात प्राचीनेबर्ही - हा जो पुरुष म्हणजे *जीवात्मा* आहे. तो पुरंजन राजा "अविज्ञात" मित्रांला सोडून एकटाच बाहेर गेला तो मित्र म्हणजे "ईश्वर". ते नगर म्हणजे नवद्वारे दोन डोळे, दोन नासिका, दोन कान, मुख हे सात द्वार वरचे आणि मलमूत्र विसर्जन करणारे दोन असे नऊ दरवाजे, ती बुद्धी म्हणजे स्त्री आणि त्या बुद्धीने शरीरात आणून ठेवलेल्या पाच इंद्रिये व त्यांच्या वृत्ती हे तिच्या मित्र-मैत्रिणी. रक्षण करणारा पाच फण्यांचा नाग म्हणजे पंचप्राण. दोन आंधळ्याबरोबर हिंडतो म्हणजे आत्मा हात व पाय यांचे सारखे सहाय्य घेतो. अंत:पुर म्हणजे हृदय व मंत्री म्हणजे मन व हा जीव मनासह दुःख, मोह, आनंद वगैरेचा आनंद घेतो. ईश्वरभक्ती नाही, कर्म नाही, परमेश्वराने उद्देश केला. नारद सांगतायेत तुम्हीही विचार करा यज्ञ करून काय करणार ? कारण ज्यांमुळे परमात्मा संपुष्ट होईल अशी आत्मविद्या व ज्ञान तु मिळवले नाहीस. भगवंताच्या चरणांचा आश्रयच कल्याण कारक आहे हे तु जाण.
प्राचीबर्ही राजा हा सत्संगती करण्याकरता मुलांवर राज्यभार सोपवून बाहेर पडला. संतांच्या मार्गदर्शनाने त्याने आपला उद्धार करून घेतला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot